रामदास शांताराम कामत हे संगीत नाटकांत काम करणारे एक मराठी गायक नाट्यअभिनेते आणि संगीत शिक्षक होते. नाट्यगीतांखेरीज त्यांनी अनेक भक्तिगीते, स्तोत्रे आणि भावगीतेही गायली आहेत. इ.स. २००९ साली बीड येथे भरलेल्या ८९व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद रामदास कामत यांनी भूषविले होते. रामदास कामत मूळचे गोव्यातील साखळी गावातले. १९३८ साली पुराचा फटका गावाला बसला, तेव्हा मदतनिधीसाठी गोवेकरांनी 'बेबंदशाही' नाटक करावयाचे ठरवले. त्यात कामतांनी आपल्या आयुष्यातली पहिली भूमिका करताना दोन पदेही सादर केली. पुढे कामत मुंबईला येऊन अर्थशास्त्राचे पदवीधर झाले. पण त्यांच्या मनात गाणे कायम रुंजी घालत होते. तरी आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना संगीताला वाहून घेणे शक्य झाले नाही. नोकरी सांभाळूनच ते आकाशवाणीवर गात आणि जमेल तेव्हा संगीत नाटकांत कामे करीत.