कोकणातील मंत्रमुग्ध 🤗 करणारे मालवणी भजन ❤|Kokanatil Bhajan😍#malvanibhajan #kokanganpati#कोकण#कोकणीभजन
#भजन #मालवणीभजन #sindhudurg
✴️ कोकणातील भजन ✴️
भजन म्हणजे भक्ती. या भक्तीत एकरूप होण्यासाठी टाळ-मृदंगाच्या साथीने रंगून जाणं, ही कोकणची खासियत. गणेशोत्सवात तर या भजनांना अधिकच रंग चढतो. गणेशोत्सवाच्या रात्री भजनाच्या साथीने सजतात, जागविल्या जातात. महिनाभर आधीच नवी गाणी, नवी बारी बसवण्यासाठी भजन मंडळांची तयारी सुरू होते. तबला, मृदंग सजवणार्या कारागिरांची लगबगही वाढते. चतुर्थीच्या रात्री गॅस बत्तीच्या उजेडात टाळ-मृदंगासह भल्या मोठ्या पायपेटीचं ओझं घेऊन लगबगीनं वावरणारी भजनी मंडळं बघितली की, या भजन कलेबद्दल अप्रूप वाटायला लागतं. कोकणात प्रत्येक वाडीवर आता भजनी मंडळं असतात. गावातील माहितगाराच्या मार्गदर्शनाखाली किंवा बाजारात येणार्या मान्यवर बुवांच्या कॅसेट ऐकून आपल्या भजन बार्या बसवल्या जातात.
मध्यंतरीच्या काळात काहीशी मागे पडलेली भजन कला आता वाढत्या स्पर्धांमुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. ही कला आता व्यावसायिक रूप घेत आहे. पूर्वी केवळ चतुर्थीतच ऐकू येणारी भजन बारी आता वर्षभर विविध कार्यक्रमांची रंगत वाढवताना दिसते. आता तर भजन कलाकार संघटितही होऊ लागले आहेत. कालानुरूप चित्रपटातील गाण्यांमध्ये बदल घडत गेले तरी पूर्वापार चालत आलेला भजनी साचा तसाच राहिला आहे. गण, स्तवन, नोटेशन रूपकामधला गजर, अभंग, गौळण, कव्वाली किंवा भारूड आणि शेवटचा गजर असं भजनाचं रूपडं तर गाणं म्हणणारा बुवा, मृदुंगमणी, चक्कीवाला (तालरक्षक) कोरस अशी भजनी मंडळी! 'जय जय राम कृष्ण हरी'ने सुरू झालेलं, उत्तरोत्तर कव्वाली, गजरात रंगत जाणारं भजन ऐकून मन तल्लीन होतं.
भजन आनंदात तसंच दु:खातही केलं जातं. अर्थात प्रसंगानुरूप त्यात बदल होतो. चतुर्थीतील भजनी बारीत गणेश-शंकराच्या गाण्यांचा भरणा असतो तसा वार्षिक मांडांवरील सदरेवरही याच भजनाचा गजर होतो. बारशाच्या वेळी अभंगाची जागा पाळण्याने घेतलेली असते तर म्हाळाच्या वेळी गजर बदलतो. जगाचा निरोप घेणार्या एखाद्या व्यक्तीची अंत्ययात्रा रामनामाच्या भजनात निघते. पूर्वीच्या आणि आत्ताच्या भजनातील गाण्यांवर त्या त्या कालावधीत हिट होणार्या चित्रपट संगीताचा प्रभाव पडला नसता तरच नवल! 'वाजले की बारा..' किंवा 'ढिंक चिका ढिंक चिका..' यांसारख्या गाण्यांच्या चाली आता भजनात ऐकू येऊ लागल्या आहेत. पण बुजुर्ग भजन कलाकारांच्या मते, सात्त्विक भजनांना अशा चाली लावणं अयोग्य आहे. त्याऐवजी सुरेल, सात्त्विक नवीन चालीत भजन करणं योग्य. भजनाची सुरुवात 'कैलासराणा शिवचंद्र मौळी', 'सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके' या प्रकारच्या गणांनी होते. त्यानंतर 'जय जय राम कृष्ण हरी'ने भजनाची सुरुवात होते. पण काही कल्पक बुवा स्तवनाच्या जागी 'गणपती शिवहरी भास्कर अंबे सा नि ध प म ग रे सा' यांसारखी नोटेशन्स बसवून सुरेल सुरुवात करतात. यानंतर रूपकात पूर्वापार चालत आलेल्या 'सुंदर ते ध्यान' किंवा 'रूप पहाता लोचनी' यांसारख्या पारंपरिक अभंगासोबतच नावीन्यपूर्ण रचनांचा भरणाही आता होऊ लागला आहे. कालानुरूप भजन कलेत झालेल्या चांगल्या बदलांमुळे आज उडत्या चालीच्या चित्रपट गीतांच्या जमान्यातही भजनी गाणी लोकांच्या तोंडी आहेत. यानंतर भजनाला रंग चढवणार्या गजराच्या वेळी 'ज्ञानोबा माउली तुकाराम...' किंवा 'देवा अलीकडे ने मला पलीकडे ने...', 'नदी भरली चंद्रभागा...' अशा गजरांबरोबरच ठेका धरला जातो. यासोबतच 'लहान मूर्ती, महान कीर्ती, कळू द्या महती, सिंधुदुर्ग जिल्ह्याची...' असे निराळे गजरही ऐकू येतात. त्यात 'मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण...' किंवा 'चंदन भाळी, शीतल गंगा...' यांसारख्या संत रचनांचाही प्रभाव आढळतो. त्यातही तुकाराम, ज्ञानेश्वर या संतांचे अभंग सर्वाधिक गायले जातात. यानंतर शृंगाररसाने पूर्ण अशा गौळणींनी भजनाचा नूरच बदलतो. 'नेसली ग बाई चंद्रकळा टिपक्याची...', 'कान्हा मारू नको पिचकारी...' यांसारख्या गौळणी म्हटल्या जातात. भजनातील वाद्यांचा ठेका गाण्यांनुसार बदलत जातो.
अभंग रूपकात टाळापेक्षा चक्कीची साथ महत्त्वाची असते. कव्वाली किंवा भारुडानंतर गजर असा क्रम असतो. पण वार्षिक मांडांवरील सप्ताहातील भजनात मात्र अभंगानंतरच्या गाण्यात बदल होतो. 'विठोबा ये रे सरदारा, सातजणी बाया आठवा काना' अशी गजराची गाणी वाजू लागतात. हेच भजन म्हाळवसात असेल तर भजनातील गजर मृत माणसांच्या आत्म्यांना आवाहन करणारा असतो. जसं 'दत्तारामाच्या आत्म्या नमस्कार माझा तुला, तुझ्या मुलांना सोडून गेला, संसार अपुला उघडा पडला' तर बारशाच्या वेळी भजनात 'नामदेवा पुत्र झाला, विठोबा यावे बारशाला' किंवा 'हलके हलके जोजवा..' असे पाळणेही ऐकू येतात. एकूणच भजन ही सुख-दु:खात सदा सर्वकाळ सामावून घेणारी कला आहे.
कोकणात गणेशोत्सव काळात भजनाचे नानाविध प्रकार पाहावयास मिळतात. संध्याकाळी ७च्या दरम्यान सुरू झालेले भजनी मेळे सकाळी ६ वाजेपर्यंत सुरू असतात. तहान भूक विसरून भाविक तल्लीन होतात. उसळ, बुंदीचे लाडू, एकूणच काय आनंद आणि उत्साहाचे उधाण घेऊन आलेल्या या सणामुळे कोकणची भजन परंपरा कित्येक वर्षे तग धरून आहे.
धन्यवाद... जय जय राम कृष्ण हरी.
🙏सुनील पंडित
For contact sunilpanditbusiness@gmail.com
पेटीवादक आणि गायक : अवधूत प्रभूतेंडोलकर
व्यवस्थापना : रवींद्र पंडित
Don’t Forget To Like , Comment , Share & Subscribe
26 авг 2024