सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव. पूर्वी या गडाला भोरप असेही म्हणत असत. पुढे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवछत्रपतींचा पदस्पर्श या गडाला झाला आणि याचे नाव सुधागड ठेवले गेले. या गडाची साधारणतः उंची ५९० मीटर आहे. झाडांमध्ये लपलेला हा गड विस्ताराने फारच मोठा आहे. या गडावर जाण्यासाठी तीन प्रमुख वाटा आहेत.
सुधागड हा किल्ला फार प्राचीन आहे. या परिसरात अस्तित्वात असणारी ठाणाळे लेणी, ही २२०० वर्षांपूर्वीची आहेत. यावरून असे अनुमान निघते की सुधागड हा देखील तितकाच जुना किल्ला असावा. पुराणात भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात. याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना या डोंगरावर केली.
शिवाजी महाराजांनी १६५७-५८ मध्ये जेव्हा आदिलशाही मुलुख जिंकला त्या वेळी सुधागडावर हा किल्ला स्वराज्यात सामील झाला असावा.नारो मुकुंद सबनीस यांच्या कडे गड होता. शिवरायांनी या गडाचे भोरपवरून सुधागड असे नामकरण केले. राजधानीसाठी याही गडाचा विचार शिवरायांनी केला होता, असे सांगितले जाते.
इ.स. १६९४ साली याबाबत असा उल्लेख आढळतो की, 'साखरदर्यात मालवजी नाईक कारके यांनी माळ लाविली. सरदार मालोजी भोसले यांच्या हाताखाली जाधव आणि सरनाईक हे प्रथम किल्ल्यावर चढले. या धारकऱ्यांना उभे करून त्यांचे पाठीवर हैबतराव चढले. त्यास संभाजीराव पुढे जाऊन माथा गेले. पंचविसाने पुढे जाऊन गस्त मारिली. बोकडसिलेचा पहारा मारला. पुढे भोराईच्या टप्प्यावरी गेले तो सदरेतून किल्लेदार व लोक धावत आले. हाणहाण झाली त्या समयी किल्लेदार कामास आले. उपरांतिक जाऊन सदर काबीज केली.
गडाच्या पायथ्याशी असलेल्या 'पाच्छापूर' या गावातच छत्रपती संभाजी राजे व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याची भेट झाली होती. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, त्याचा मुलगा आवजी बल्लाळ, आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी छत्रपती संभाजी राजांनी सुधागड परिसरात असणाऱ्या परली गावात हत्तीच्या पायी दिले.
पहाण्याची ठिकाणे :
सुधागडाचे पठाराचे तीन विभाग होतात. पहिला विभाग म्हणजे वाड्यासमोरील पश्चिमेकडील पठार. या परिसरात मोठ्या प्रमाणात वास्तूंचे अवशेष दिसतात कारण जमीन समतोल असून येथेच तलाव आणि मोठी टाकी आहेत. दुसरा विभाग म्हणजे भोराई देवीचे मंदिर आणि टकमक टोकापर्यंत असलेला परिसर. हा निमुळता असून येथे ४ विशाल कोठारांचे अवशेष आहेत. तर तिसरा भाग म्हणजे पूर्वेकडील परिसर. इकडे एक विशाल बुरुज असून वाढलेल्या जंगलात काही अवशेष आढळून येतात.
पंत सचिवांचा वाडा
पाच्छापूर मार्गे चढून गेल्यावर आपण पठारावर पोचतो. येथे तलाव डाव्या बाजूस ठेवून तेलबैला समोर ठेवून सरळ चालू लागलो की १० मिनिटात एका वाड्यात पोचतो. सुधागड किल्ल्यावर असणारा पंत सचिवांचा सरकारवाडा हा इ.स. १७०५ साली बांधलेला आहे. चौसोपी आकाराच्या या मजबूत व भव्य वाड्याची अर्धीच बाजू राहिली होती. तथापि श्री भोराई देवस्थान विश्वस्त मंडळाने पुनर्बांधणीचे काम हाती घेतले.
गडावर पोचण्यास २ वाटा आहेत -
ठाकूरवाडी अथवा दर्यागावातून
पालीपासून भिरा कडे जाणाऱ्या हमरस्त्यावर ८ किमी वर पाच्छापूर गाव आहे. येथून पुढे ठाकूरवाडी अथवा दर्यागाव वसलेले आहे. येथून एका सोप्या पायवाटेने गडावर २ तासात आपण पोचतो. ठाकूरवाडीतून वर जाताना मध्ये लोखंडी शिडी लागते. पाच्छापूर गावातूनही एक वाट वर येते. या दोन्ही वाटा एका घळीपाशी मिळतात. येथे महाकाय चिलखती बुरुज आपले स्वागत करतात. या घळीतून वर गेल्यावर आपण एका पडक्या दरवाजातून जातो, हाच पाच्छापूर कडील दरवाजा. येथून आपण १५ मिनिटे चढल्यावर गडमाथ्यावर पोचतो.
धोंडसे गावातून
पालीहून नाडसूर / धोंडसे गावी पोचून आपल्याला येथून दगडी पायऱ्यांच्या मार्गाने गडावर पोचता येते. इथली वाट झाडीतून असल्यामुळे सुखद आहे, पण येथून चढण्यास अंदाजे २.५ ते ३ तास लागतात. तेलबैला जवळून उतरणारा सवाष्णीचा घाट हा आपल्याला याच मार्गावर घेऊन येतो. येथून आपण गडाच्या गोमुखी पद्धतीच्या महादरवाजातून प्रवेश करत थेट भोराई देवीच्या मंदिरात पोचतो.
Plz Watch, Like, Share and Subscribe our Channel!
Also Follow us on :-
Facebook: / travels.premi.9
Instagram: www.instagram....
#sudhagad #sudhagadfort #trek #pali #sudhagadfortpali #sudhgadkilla #killa #maharastraforts #SudhagadFortTrek #maharashtratourism #forts #trekking #raigad #sahyadri #trekking #sahyadrimountains
11 окт 2024