🙏🏻 नमो गुरवे वासुदेवाय 🙏🏻
प.प. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचा अखेरचा उपदेश
एक दिवस नित्याप्रमाणे गरुडेश्वरी भाष्य पाठ चालू होता. तो संपवून श्री स्वामी महाराज सर्वांना उद्देशून म्हणाले की 'आज काही बोलायचे आहे.' लोकांचे मन कानात येऊन बसले. श्री स्वामी महाराज म्हणाले, "आजपर्यंत जो प्रत्यक्ष उपदेश केला व ग्रंथ लिहिले त्या सर्वांचे सार आज संगायचे आहे…”
"मुक्तीचा लाभ करून घेणे हे मनुष्यजन्माचे मुख्य कर्तव्य आहे. त्याकरितां प्रथम मन स्थिर व्हावे, या उद्देशाने वर्णाश्रमविहित धर्माचे यथाशास्त्र पालन झाले पाहिजे. वेदांताचे श्रवण, मनन व निदिध्यासन नित्य करावे. मुख्यतः श्रवणाकड़े अधिक लक्ष द्यावे. त्यामुळे मनातील आसक्ति कमी होईल. सात्विक प्रवृत्तीनेच मानवांची उन्नति होते. सात्विक प्रवृत्ति होण्याकरितां आहार हा हित, मित,मेध्य म्हणजे पवित्र असण्याकड़े लक्ष दिले पाहिजे. स्वधर्मावर दृढ़ श्रद्धा, स्नान, संध्या, देवपूजा, पंचमहायज्ञ वेळेवर करणे, अतिथी सत्कार, गो-सेवा, कीर्तन, भजन, पुराण यांचे श्रवण, सर्वांबरोबर गोड बोलणे, दुसऱ्याचे नुकसान होईल असे न वागणे, माता पितरांची सेवा करणे, स्त्रियांनीहि सासरी राहून सासु सासरे व इतरही वडील माणसे यांच्या आज्ञेत पतीची दृढ़ निष्ठेने सेवा करणे, इत्यादि गुण आपल्यामध्ये येणे म्हणजे आपली प्रकृति सात्विक बनल्याची चिन्हे आहेत. उदरनिर्वाहाकरितां व्यापार, शेती, नोकरी, कोणताही धंदा केला तरी वेद विहित कर्म व गुर्वाज्ञा-पालन हे कधीही सोडूं नये. स्वकर्म केले तरच अंतःकरण शुद्ध होते. अंतःकरण शुद्ध झाले तर उपासना स्थिर होते. उपासना स्थिर झाली तर मनाला शांती मिळते आणि मनाची गडबड थांबली म्हणजे आत्मज्ञान होऊन मोक्षाचा लाभ होतो."
याप्रमाणे त्यांनी अत्यंत सारगर्भ व अमृतोपम उपदेश केला. "हे सर्व थोडक्यात सांगितले आहे, याप्रमाणे जो वागेल तो शेवटी सुखी होईल." असे सांगून श्री स्वामी महाराज थांबले.
महाराजांच्या आजच्या भाषेवरून या पुढची ही निरवानिऱव तर नसेल असे वाटून काही जणांचे डोळे पाण्याने भरून आले.
।। भक्तवत्सल भक्ताभिमानी राजाधिराज श्री सदगुरुराज वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय ।।
🙏🏻 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
15 окт 2024