Veer Yatra is an unexplored Festival of India. Veer Yatra happens in Veer, Maharashtra. Veer Mhaskoba is the manifestation of the Kala Bhairava form of Shiva.
श्रीनाथ म्हस्कोबा वीर यात्रा २०२३। महाराजांचा संचार। veer yatra 2023
पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्याचे मुख्यालय असलेल्या सासवड शहरापासून २५ किमी आणि अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्रीखंडेरायाच्या जेजुरीपासून ३० किमी अंतरावर पुणे व सातारा जिल्हयाच्या सीमेवर 'वीर गाव(ता.पुरंदर,जि.पुणे) नावाचे गाव असून येथे पूर्णगंगेच्या उत्तर तीरावर श्रीनाथ म्हस्कोबाचे पवित्र देवस्थान आहे.
हे मंदिर दगडी बांधकाम असणारे 'देऊळवाडा' या भव्य प्राकारात असून पूर्वाभिमुख मंदिराची सदर, सभामंडप, गाभारा अशी रचना केलेली आहे. मंदिराच्या चहुबाजूने उंच असा चिरेबंदी तट असून पूर्व व दक्षिण अशी दोन महाद्वारे आहेत. गाभाऱ्यात श्रीनाथ -जोगेश्वरी आई यांच्या स्वयंभू मूर्ती आहेत. श्रीनाथ हे काशीचे कोतवाल काळभैरव तसेच सोनारीचे सिद्धभैरव असून कमळाजी नामक धनगर भक्तामुळे वीर या ठिकाणी वास्तव्यास आले आहेत. हा देव स्मशानभूमीत प्रगट झाल्याने यांना म्हस्कोबा असे नाव मिळाले आहे.
माघ पौर्णिमेला श्रीक्षेत्र वीर येथे मोठी यात्रा भरते. "नाथसाहेबाचं चांगभलं!" , "सवाई सर्जाचं चांगभलं! "च्या गजरात ढोल -ताशांच्या निनादात गुलाल -खोबऱ्याची चौफेर उधळण करत पारंपरिक व उत्साही वातावरणात श्रीक्षेत्र वीर येथे श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा दरवर्षी माघ महिन्यात साजरा होतो. रथसप्तमीच्या दिवशी देवांच्या लग्नपत्रिका वाटण्याचे काम घडशी-गुरव हे करतात. श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थानचा वार्षिक यात्रा महोत्सव देवाच्या हळदी समारंभाने माघ शुद्ध चतुर्दशीला सुरू होतो. चतुर्दशीच्या सायंकाळी वीर व राऊतवाडी येथील देवाचे मानकरी राऊत-माळी श्रीनाथ महाराजांना भरजरी पोषाख व आदिमाया जोगेश्वरी मातेला मानाची साडी-चोळी व हळद वाजतगाजत घेऊन येतात. गुरवपुजारी देवाला हळदीचा पोषाख नेसवतात. नंतर राऊत मंडळीच्या सुवासिनींच्या हस्ते देवाला हळद लावण्यात येते. यावेळी वीर गावातील व पंचक्रोशीतील सुवासिनी देऊळवाड्यात हळद लावण्यासाठी आवर्जुन गर्दी करतात.
पौर्णिमेच्या दिवशी गावात सर्वत्र गडगनेर असतो. पुरणपोळीचा गोड नैवेद्य करून मंदिरात आणला जातो. कारण गावातील प्रत्येक घरात कमीत कमी एकालातरी विवाहसोहळ्याच्या ५ दिवस आधी 'देवाच्या लग्नाचा ५ दिवसाचे उपवास' धरण्याचा रीवाज आहे. तो उपवास या दिवशी सोडतात. बाहेरून येणाऱ्या भाविकांना व वऱ्हाडी मंडळींना दुपारनंतर श्री.धुमाळ(वाडकर) परिवाराकडून महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येते. परंपरेनुसार कोडीत, वाई, कन्हेरी, राजेवाडी, भोंडवेवाडी, सोनवडी आणि पुण्यातील कसबापेठ येथून सोहळ्यासाठी पालख्या येतात.
मध्यरात्री ११:३० च्या सुमारास राऊतवाडीचे राऊतमंडळी मानाच्या आरत्या, लग्नाचा पोषाख व बाशिंगे मंदिरात आणतात. श्रीनाथ म्हस्कोबा महाराज माघ महिन्याच्या पौर्णिमेला रविवारी राऊत-माळी यांच्या शेतात प्रकट झाल्यामुळे ते वरपक्षाचे झाले देवाच्या हळदीचा व लग्नाचा मान त्यांना मिळाला आहे. याच वेळी सालकरी फुलमाळी चाफ्याच्या फुलाची मुंडावळी आणून देतात. लग्नाचा हा सर्व साजशृंगार गुरवपुजारी देवाला करतात. देवाचे मानकरी देवाच्या नावाचा जयघोष करतात. श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचा नावाचा चांगभलं करत मानकरी राऊत मंडळीमार्फत श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचा लग्न लावलं जातं.देवाच्या नावाचा जयघोष अर्थात चांगभलं ह्याच मानकरी राऊत मंडळीकडून श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या लग्नाच्या मंगलाष्टका असतात.
दहा दिवस चालणाऱ्या या यात्रेत रोज दुपारी व रात्री देऊळवाड्यात छबिना भरतो. भाविक-भक्त, आबालवृद्ध बेभान होऊन नाचत असतात. वद्य पंचमीपासून श्रीनाथांचा संचार सुरू होऊन भाकणूक (भविष्यवाणी) सुरू होते. वार्षिक पीक-पाणी, रोगराई संबंधीची भविष्यवाणी सांगण्यात येते. तसेच या पंचमीपासूनच 'गजेजेवण' घालणे ही सुरू होते. ज्याप्रमाणे देवीच्या नावाने सवाष्ण जेवायला बोलवितात तसे 'गजेजेवण म्हणजे श्रीनाथांच्या नावाने कमीतकमी ५ बाळगोपाळ जेऊ घालणे.
16 окт 2024