🙏 नमस्कार !
🔸 प.प.श्रीमद वासुदेवानंद सरस्वती ( टेंबे ) स्वामी महाराजांची (ओम सदगुरू प्रतिष्ठान - बोरीवली, खोपोली) प्रासादिक आरती सदगुरु प. पू. आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज उर्फ प.पू. भाऊ महाराज करंदीकर यांनी १५ मार्च १९७८ (तुकारामबीज) या दिवशी सुरू केली .
🔸 प.पू. भाऊ महाराज, प्रश्न विचारण्यास येणाऱ्या नवीन भक्तांस 11 गुरुवार - शनिवार ,स्थानावर आरतीस उपस्थित राहण्यास सांगत....याची प्रचिती भक्तांना येत असे.... आजही अनेकांना याचा लाभ झाला आहे... आरतीची वेळ संध्याकाळी 7.25 ची असे...
🔸 ज्या भक्तांना काही अपरिहार्य कारणांमुळे आरतीला उपस्थित राहणे शक्य नसल्यास , प.पू.भाऊ महाराज त्यांना संध्याकाळी 7.25 ला स्वगृही किंवा कॅसेट लावून आरती म्हणण्यास सांगत ...
🔸 खास करून ज्या भक्तांना काही समस्या मुक्ती करिता 11 गुरुवार आरती म्हणायची / श्रवण करायची असेल व आरतीची ऑडिओ क्लीप सेव केली नसेल त्यांना व सर्वांनाच याचा लाभ / अनुभूती घेता येईल .
🔔 ज्यांना 7.25 ला आरती म्हणणे / श्रवण करणे शक्य नसेल त्यांनी आपल्या सोयीनुसार वेळ ठरवून प्रत्येक गुरुवारी आरती चा लाभ घ्यावा... व आपल्या नातेवाईक, स्नेही मंडळींना देखील लाभ घडवून द्यावा ...
ॐ ॐ ॐ
चिरायू - सद्गुरू भाऊ महाराज करंदीकर यांच्या चरित्रग्रंथातील उतारे
नवी दिशा, नवे वळण
प. पू. दादामहाराजांचे गुरु प. पू. साटमबाबा यांची १५ मार्च १९७८ (तुकारामबीज) या दिवशी पुण्यतिथी होती. त्या दिवशी प. पू. साटमबाबांचा फोटो ठेवा, त्यांच्या दोन्ही बाजूला दोन समया ठेवा आणि प. पू. साटममहाराजांची प्रार्थना करा. मात्र आरतीची सुरवात कोणत्याही परिस्थितीत संध्याकाळी ७.०० ते ७.२५ मि. पर्यंत झाली पाहिजे. जेव्हा मनात येईल, वेळ मिळेल तेव्ह आरती करू नका, हे चालणार नाही असे त्यांनी बजावून सांगितले. मी नक्की त्या दिवशी येतो असे आश्वासनही त्यांनी दिले. प. पू. दादामहाराज यांना राजाभाऊ गुरुस्थानी मानीत होते; त्यामुळे त्यांनी सांगितल्याप्रमाणे फोटो, समया, हार, प्रसाद अशी सर्व तयारी करण्यात आली. प्रसादासाठी शेंगदाणे आणि रावळगाव खडीसाखर, गावठी गुलाबाची फुले ठेवा असे सांगितले.
प. पू. दादामहाराज येतील अशी आशा होती. पण ते काही आले नाहीत. मात्र त्यांच्या आज्ञेनुसार त्यांनी सांगितल्याप्रमाणे ७.२५ मिनिटांनी आरतीला सुरवात केली. पूर्वीपासून करंदीकर कुटुंबात जी दत्तात्रेयांची आरती म्हटली जात होती, तीच आरती या दिवशीही केली गेली. प. पू. दादामहाराजांनी केलेल्या आज्ञेनुसार आणि त्यांचा शब्द शिरोधार्थ मानून, दिलेला शब्द पाळून १५ मार्च १९७८, तुकारामबीज या दिवसापासून गुरुवारची श्रीदत्तात्रेय आरती नियमाने बरोबर ७.२५ मिनिटांनी सुरु करण्यात आली. सद्गुरू सेवेमध्ये एक प्रकारची निश्चितता यावी हा हेतू त्यामागे होता. नवीन येणारे भक्त किंवा प्रथमपासून येणारे भक्त यांनासुद्धा या विशिष्ट वेळेबद्दल कुतूहल वाटत होते. अर्थात त्याचे निरकरणही राजाभाऊ यांनी खुलासेवार केले. सायंकाळी ७ ते ७.३० हि वेळ म्हणजे तिन्हीसांजेची वेळ. ही वेळ सद्गुरू यांच्या संचाराची वेळ असते. श्रीक्षेत्र नरसोबाची वाडी, श्रीक्षेत्र गाणगापूर, दत्तस्वरूप प.प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे जन्मगाव, माणगाव येथेही ७ ते ७.३० या वेळेतच आरती होते. ही शुभ वेळ, सद्गुरुंचे तेज आणि असंख्य भक्तांनी श्रद्धेने केलेली आरती असा जर सुयोग साधला गेला तर ती स्पंदने वातावरण मंगलमय करतात आणि त्याचा आनंद भक्तांना मिळतो म्हणून विशिष्ट वेळेचे बंधन पाळलेले आहे आणि आजतागायत त्या वेळेत बदल झालेला नाही.
23 авг 2020