रत्नागिरीत संरक्षण उत्पादन निर्मिती कंपनीसाठी उद्योग विभाग आणि निबे कंपनी यांच्यात एक हजार कोटी रुपयांचा करार
राज्याचा उद्योग विभाग आणि संरक्षण क्षेत्रात काम करणारी निबे लिमिटेड ही कंपनी यांच्यात आज (१८ ऑगस्ट) रत्नागिरीत सामंजस्य करार झाला. राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत या वेळी उपस्थित होते. संरक्षण क्षेत्रातल्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी निबे कंपनी रत्नागिरीत एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, त्यातून सुमारे एक ते दीड हजार रोजगारांची निर्मिती होणार आहे. या वेळी संरक्षणविषयक उत्पादनं, शस्त्रास्त्रं यांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. तसंच, संरक्षण क्षेत्रातल्या रोजगारसंधींची माहिती देणाऱ्या व्याख्यानांचं आयोजनही करण्यात आलं होतं.
सावरकर नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात सामंत म्हणाले, 'केवळ बंदूक घेऊन सीमेवर जाऊनच देशसेवा करता येते असं नाही, तर संरक्षण क्षेत्रात इतरही अनेक रोजगारसंधी आहेत. उसाच्या रसाची विक्री करणाऱ्या निबे यांनी आज संरक्षण क्षेत्रातल्या उत्पादनांच्या निर्मितीमधून महाराष्ट्राचं नाव देशाच्या आणि जगाच्या पातळीवर नेलं आहे. परदेशातून दोन लाख ३७ हजारांना आयात करावी लागणारी बंदूक निबे यांनी मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत अवघ्या ३७ हजार रुपयांमध्ये महाराष्ट्रात विकसित केली. अशा उद्योगामध्ये आता रत्नागिरीकरांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. तरुणांनी मुंबईला जाण्यापेक्षा जिल्ह्यात राहूनच काम करायला हवं. संरक्षण क्षेत्रातला आणखी एक नवा प्रकल्प रत्नागिरीत आणला जात असून, त्यातून १० हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत.'
या वेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, एमआयडीसीचे मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण, निवृत्त व्हाइस ॲडमिरल सुनील भोकरे, निबे कंपनीचे किशोर धारिया, बाळकृष्ण स्वामी, भावेश निबे, प्रकाश भामरे, निवृत्त कमोडोर सौरभ देव आदी उपस्थित होते.
24 сен 2024