#वासुदेवसंगीतसभा #vasudevsangeetsabha
गायिका-सौ. कल्याणी आमलेकर कुळकर्णी ,सौ.रसिका आमलेकर बावडेकर
निवेदन-आदरणीय,श्री.अजित कृष्ण तुकदेव,
वासुदेव संगीत सभा, वेद वासुदेव प्रतिष्ठान, पुणे
|| श्री श्रीमद् सद्गुरु संग ||
उद्धरी गुरुराया। अनसूयातनया दत्तात्रेया ।।धृ।।
जो अनसूयेच्या भावाला भुलुनिया सुत झाला। दत्तात्रेय अशा नावाला मिरवी, वंद्य सुराला।
तो तू मुनिवर्या, निजपाया स्मरता, वारिसी माया ।।१।।
जो माहुरपुरी शयन करी, सह्याद्रीचे शिखरी निवसे, गंगेचे स्नान करी।
भिक्षा कोल्हापुरी, स्मरता दर्शन दे वारी भया, तो तू आगमगेया ।।२।।
तो तू वांझेसी सुत देसी, सौभाग्या वाढविसी। ‘स्मरता’ प्रेतासी जीवविसी, 'सद्'वर दाना देसी।
यास्तव वासुदेव तव पाया धरी त्या तारी सदया ।।।३।।
“उद्धरी गुरुराया”
हे प. प. थोरले स्वामी विरचित पद, साधना मार्गावर वाटचाल करीत असताना, काही वेळा अनंत काळ प्रवास करून सुद्धा, ज्यावेळी हरवल्यासारखे वाटते किंवा भासते, त्यावेळेला ‘करुणाघन गुरुदेवतेला’ ही हाक आहे वा टाहो फोडण्यासारखे आहे.
ही हाक वा टाहो वा प्रार्थना किंवा नुसता उपचार म्हणून जरी ‘गुरुदेवाना’ उदधरून जाण्याची कळकळ व्यक्त केली तरी, नुसता सोपस्कार जरी केला, तरी ज्यांचे ब्रीद ‘उद्धरून नेण्याचे’ आहे, त्यांच्याशी अनुसंधानाच्या पायघड्या, स्वतःसिद्ध परांपराच उलगडत घेऊन येते. जाणिवेचे पद उलगडून ‘सिद्ध जाणिवे’च्या साहाय्याने ‘परम जाणिवे’कडे म्हणजेच प.प. थोरल्या महाराजांच्याकडे वा साक्षात भगवान दत्तमूर्तीकडे घेऊन जाते.
‘उद्धरी गुरुराया’ अशी ज्या जाणिवेच्या अथवा साधनेच्या पायरीवरून हाक मारली असेल, हाक मारण्यामध्ये काहीतरी मारायचे आहे, काहीतरी मरून जायचे आहे, असे जे मरणे आहे, त्यानंतरच स्मरणे आहे. ‘स्मरण’ जीवन यात्रेची पहिली पायरी आहे तसेच उद्धार मार्गावरची आणि श्री गुरुचरणांपाशी पोहोचण्याची सुद्धा. अंतिम स्थानाचे स्मरण, गुरुचरणांना हृदयात वागवून, वाढवून, जपून, मोठी प्रसन्नता बाळगून, व्यवहाराचे आपोआप विस्मरण करून देवतेचे ध्यान, स्मरणपूर्वक तेजाळून करावयाचे आहे वा असते.
प. प. श्रीमद् थोरल्या स्वामींनी ह्या दैवी रचनेत असा उल्लेख केला की त्रिदेवांनी माता अनुसूयेची कठीण परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या पत्नींच्या आग्रहावरून पातिव्रत्याची कठीण समस्या उभी केली. परंतु तेज कधी पराभूत तर होत नाहीच पण यातून ‘महातेजोनिधी’ स्त्रीने जगाला ‘साक्षात तेज आणि प्रकाश अखंड देणारा स्त्रोत’ निर्माण केला. देवांची फजिती झाली की नाही माहीत नाही, पण तेजोनिधी ने जो भाव निर्माण केला त्यावरच देव भुलले, स्वरूप विसरले, देवत्त्वाचे विस्मरण झाले व साक्षात ‘अक्षय तेजोनिधी भगवान दत्तात्रेय रूपात’ साक्षात अनुसूया मातेच्या कुशीत, तिच्या उदरात विराजमान - प्रकाशमान झाले. साक्षात ‘तेजोघन’ परंपरा सगुण रूपात उदर-क्षितिजावर प्रगट झाले. यतिवर्य - मुनिवर्य, साक्षात मायेचे अतिसूक्ष्म रुपाचे निराकरण करण्यासाठी अवतीर्ण झाले. स्मर्तृगामी परंपरा निर्माण झाली. साक्षात दत्त, दत्त म्हणताच प्रगट झाले. माया नाहीशी करून राहिले.
स्नान गंगेत, भिक्षा कोल्हापुरात, सह्याद्रीच्या शिखरावर निवास व निद्रा माहुरपुरी - सार्या विश्वाच्या पसार्यातून, मायेच्या विळख्यातून सोडविण्यासाठी अखंड संचार करीत राहिले. भयाच्या कराल दाढेतून श्री वेदांनाही ज्यांचे रूप गूढ राहिले, अशा भगवान दत्तात्रेयांना, केवळ स्मरणाने प्राप्त करण्याचे भाग्य सर्वांना लाभले. अतिसूक्ष्म गूढ सहज उकलून समोर प्रगट झाले.
‘वांझ’ - मोठा व्यापक व अर्थपूर्ण शब्द आहे. सारे जीवन ओघळून जाते, हात रिक्त रहातात, अंधार गडद होत जातो, आयुष्य वांझ होत जाते. जीवनसार वा फळ गुरुचरणी अर्पण करावे असे काहीच रहात नाही. स्त्रीला पुत्र देणे, जीवनाला अर्थफळ देणे, चारही पुरुषार्थांना सफल करणे, ‘परमजाणिवेचे’ रहस्य उलगडून दाखविणारी ही दत्त देवता - प. प. थोरल्या महाराजांचे परम दैवत!
महाराजांनी ‘दत्त चरण’ हृदयाशी धरले. का? तर तुमच्या माझ्या हृदयात प्रगटण्यासाठी,
“वांझपण नष्ट करण्यासाठी!”
हे आर्ष ‘पद’ - गुरु ‘पदांपर्यंत’ घेऊन जाते.
कळले तरी ठीक - नाही कळले तरी ठीक.
बस
वासुदेवांचे चरण!..
15 окт 2024